राजगड : प्रतिनिधी राजेंद्र रणखांबे
राजगड तालुक्यातील निघडे येथे शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने धाडसी रेस्क्यू मोहिम राबवत सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे बिबट्याचा जीव वाचला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निघडे येथील शिवाजी बांदल यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे पोलीस पाटील जितेंद्र मुजुमले यांनी तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन गटावर दिली. ही माहिती मिळताच वन विभागाने तातडीने रेस्क्यू पथक घटनास्थळी रवाना केले.
पथकाने परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेची उपाययोजना करत विशेष साधनसामग्रीच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. काही वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी बिबट्याला बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले.
ही यशस्वी कारवाई वनक्षेत्रपाल अनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दया डोमे तसेच वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे, विकास निकम, संजू कांबळे, योगेश टिकोळे, स्वप्नील उंबरकर, निखिल रासकर, भाग्यश्री जगताप आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सापडलेला बिबट्या वयाने लहान असून परिसरात त्याची आई किंवा इतर बिबटेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वांगणी, निघडे, कोसगाव आदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्री एकटे फिरणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.










