भोर तालुक्यातील करंदी खेबा येथे जुन्या वादाच्या रागातून शेतकऱ्यावर गोठ्यात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तात्रय खाटपे (वय ३४, व्यवसाय शेती व दुग्धव्यवसाय, रा. करंदी खेबा, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही घटना घडली.
फिर्यादी यांचा गावातील काही व्यक्तींशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी आकाश राजू शिंदे (रा. उत्तमनगर, पुणे) व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने गोठ्यात येऊन फिर्यादीवर हल्ला केला. आरोपींनी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करत लाकडी दांडक्याने तसेच प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.






