रहाटवडे प्रतिनिधी
समीर कांबळे
तालुक्यातील मौजे रहाटवडे येथे आयोजित करण्यात आलेला ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा’ नुकताच अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. माघ शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर *‘राम कृष्ण हरी’*च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
सोहळ्याच्या विशेष सत्रात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी) यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. कीर्तनातून त्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण तसेच ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत भाविकांसमोर मांडले. यावेळी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते.
या सप्ताहात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण वाचन, सायंकाळी हरिपाठ असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. रात्रीच्या सत्रात कांजळे, खेड, श्रीरामनगर, नऱ्हे आणि गोऱ्हे बु. येथील भजनी मंडळांनी ‘हरिजागर’ सादर करत टाळ-मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिरसात न्हाऊन काढले. अभंगांच्या सुरावलीत ग्रामस्थ रात्रभर भक्तीत तल्लीन झाले होते.
या सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ मंडळ, रहाटवडे, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, जिजामाता महिला भजनी मंडळ आणि सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ रहाटवडे परिसरातील अनेक भाविकांनी घेतला. वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी तरुण पिढीचा सहभाग कौतुकास्पद असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.










