पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिवरे गावाच्या हद्दीतील फ्लायओव्हर परिसरात रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना महामार्गाच्या बाजूला असलेला रस्त्याचा काही भाग खाली-वर झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने अचानक उंचसखल भाग निर्माण झाला आहे. वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांना याचा अंदाज न आल्याने वाहनाचे संतुलन बिघडते आणि अपघात घडत आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नसली तरी काही वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून दररोज हजारो वाहने या महामार्गावरून प्रवास करतात. मात्र रस्त्याची अवस्था अपूर्ण असल्याने वाहनचालकांसाठी हा भाग धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिक व नियमित प्रवासी वाहनचालकांनी या समस्येकडे लक्ष वेधले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच टोल नाका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि उंचसखल भाग समतल करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







