आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर–राजगड तालुकास्तरीय ५३ वे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न १३६ शाळांचा सहभाग; हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती, गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा गौरव


प्रतिनिधी : विशाल शिंदे नसरापूर 

नसरापूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रशस्त परिसरात भोर व राजगड तालुक्यांचे संयुक्त ५३ वे तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडले. शुक्रवार, दि. १२ डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ झाला असून शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभाने या उपक्रमाचा समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या विज्ञान महोत्सवात भोर व राजगड तालुक्यातील एकूण १३६ शाळांनी सहभाग नोंदवला होता.

प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, उपशिक्षणाधिकारी श्री. किशोर चांदेल, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू प्रा. एम. जी. ताकवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे कौतुक केले.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भोर व राजगड तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट दिली. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाशी संबंधित प्रयोग, कार्यरत मॉडेल्स, प्रतिकृती आणि शैक्षणिक साहित्य प्रत्यक्ष पाहून संकल्पना समजून घेतल्या. पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा बचत, आरोग्य, मानवी शरीररचना, आधुनिक तंत्रज्ञान तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. बालवैज्ञानिकांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पांची माहिती देत प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर केले.

या विज्ञान प्रदर्शनात भोर तालुक्यातील १०३ शाळांचा सहभाग होता. त्यामध्ये प्राथमिक गटातील ५१, माध्यमिक गटातील ३७ प्रकल्प सादर झाले. याशिवाय प्राथमिक शिक्षकांचे १०, माध्यमिक शिक्षकांचे २ प्रकल्प, प्रयोगशाळा परिचर गट, तसेच प्राथमिक व माध्यमिक दिव्यांग गटातील प्रत्येकी एक प्रकल्प मांडण्यात आला. राजगड तालुक्यातील ३३ शाळांनी सहभाग घेतला असून प्राथमिक गटातील १७, माध्यमिक गटातील १० प्रकल्पांसह शिक्षक व परिचर गटातील प्रकल्पही सादर करण्यात आले.

समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री .एल. एम .पवार उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नसरापूर येथील शिक्षक सागर प्रल्हाद खैरमोडे यांनी “विज्ञान शैक्षणिक साहित्य” या विषयावर सादर केलेल्या उत्कृष्ट साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. इयत्ता सातवीसाठी तयार केलेले ज्वालामुखी, वनस्पती पेशी व प्राणी पेशी मॉडेल, पचनसंस्था, जलचक्र, हवेचा दाब आणि प्रकाश संश्लेषण क्रिया या शैक्षणिक साहित्याचे विशेष कौतुक करण्यात आले. द्वितीय क्रमांक शिक्षक संदीप नामदेव दानवले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासुर्डी खेबा) यांनी पटकावला.

विविध स्पर्धा जसे की वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये इयत्ता सहावी ते आठवी प्राथमिक गटात प्रथम क्रमांक शाश्वत दीपक मालुसरे , द्वितीय क्रमांक वेदांती सागर ओझा, तृतीय क्रमांक देवयानी विठ्ठल बडे या विद्यार्थ्यांनी मिळविला.माध्यमिक गट (इयत्ता नववी ते बारावी) मध्ये करण दत्तात्रय इंगुळकर, कु. सृष्टी सचिन बाबर, कु. सानिका समीर काळहाणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. संघ प्रकल्पांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.

दिव्यांग गटामध्ये प्राथमिक गटात संग्राम पासले तर माध्यमिक गटात श्रीधर अमित साबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची दाद मिळवली. माध्यमिक शिक्षक गटात श्री. भरते एस. एम. (दिनकरराव धावडे पाटील माध्यमिक विद्यालय, सारोळा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर परिचर गटात केशव तुकाराम पवळे (राजा रघुनाथराव विद्यालय, भोर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद पुणेचे उपशिक्षणाधिकारी किशोर चंदेल, भोर गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, राजगड तालुका गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील, विस्तार अधिकारी शकील मुल्ला, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल चिकणे, भोर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, सचिव संतोष चव्हाण, प्राचार्य संजय यादव यांच्यासह अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, निरीक्षण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी गुणवत्ता व नवकल्पनांची क्षमता असल्याचे या प्रदर्शनातून अधोरेखित झाल्याचे त्यांनी नमूद केले.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!